मध्यप्रदेश (वृत्तसंस्था) मध्यप्रदेश राज्यातल्या सागर जिल्ह्यात हृदय हेलावणारी घटना घडली आहे. ३५ दिवसापूर्वी सागर जिल्ह्यातील एनएच २६ महामार्गावर कार दुर्घटनेत जिवंत जळाल्याने पतीचा मृत्यू झाला. या धक्क्यातून न सावरणाऱ्या पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
३५ दिवसांपूर्वी ३२ वर्षीय रिजवाना खान हिच्या पतीचा मृत्यू झाला. कार दुर्घटनेत तो जिवंत जळाल्याची दुर्घटना घडली होती. पतीचं जाणं सहन न झाल्यानं रिजवानानं आपल्या वडिलांच्या घरी शाहगढ येथे आत्महत्या केली आहे. रिजवानाला काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. शुक्रवारी संध्याकाळी रिजवानाच्या घरातले तिच्या खोलीत गेले आणि तिला तयार होण्यास सांगितलं. मात्र खूप वेळ झाल्यानंतरही रिजवाना खोलीतून बाहेर आली नाही. कुटुंबियांनी तिला हाक मारली मात्र त्याला तिनं काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर घरातले सर्वजण तिच्या खोलीत गेले. तेव्हा रिजवाना आपल्या खोलीत पंख्याला लटकलेली दिसली. रिजवानानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेह आता पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलीस या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहे.