अहमदाबाद (वृत्तसंस्था) इस्त्रोमधील एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने त्याच्यावर इस्त्रोच्या मुख्यालयात विषप्रयोग झाला होता असा धक्कादायक खुलासा केला आहे. तपन मिश्रा असे त्या वैज्ञानिकाचे नाव आहे. मिश्रा यांनी ‘लॉंग केप्ट सीक्रेट’ नावाने एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी हा गंभीर खुलासा केला आहे. तसेच या पोस्टमधून त्यांनी सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
तपन मिश्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, मला विष कोणी आणि का दिलं याबाबत मला कल्पना नाही, बंगळुरू येथील मुलाखतीवेळी मला नाश्त्यातून विष देण्यात आलं होतं, घरी जे आर्सेनिक दिलं जातं, ते ऑर्गेनिक होतं, जे विष मला दिलं होतं ते इनऑर्गेनिक ऑर्सेनिक होतं, याची एक ग्राम प्रमाणही कोणत्या मनुष्याला जीवे मारण्यासाठी पुरेसे असतं. तसेच या विषप्रयोगानंतर मला सलग २ वर्ष उपचार घ्यावे लागले त्यामुळे आजपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मी भाग्यवान आहे कारण हे विष प्यायल्यानंतर कोणीही जिवंत वाचू शकत नाही, मी जानेवारी महिन्यात निवृत्त होणार आहे, त्यामुळे मी मेलो तरी माझ्यासोबत काय घडलं हे लोकांना माहिती असायला हवं म्हणून मी ही पोस्ट करत आहे. तपन मिश्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये एम्समधील मेडिकल रिपोर्टचे फोटोही जोडले आहेत.
२३ मे २०१७ रोजी मला माझ्या जेवणातून आर्सेनिक ट्रायऑक्साईड हे विष देण्यात आले होते. डोशासोबतच्या चटनीमध्ये ते विष मिसळून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ‘माझ्यावर विषप्रयोग झाल्यानंतर काही वेळाने मला गृह विभागाचे सुरक्षा अधिकारी भेटले व त्यांनी मला या विषप्रयोगाबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनीच मला वेळीच डॉक्टरकडे नेले. पण त्या विषप्रयोगामुळे माझ्या तब्येतीवर वाईट परिणाम झाला. मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा, त्वचेचे विकार झाले होते’, असे मिश्रा यांनी या पोस्टमध्ये लिहले आहे. या पोस्टसोबत त्यांनी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील त्यांचा एक रिपोर्ट देखील पोस्ट केला आहे. ‘लष्कराच्या कार्यात तसेच व्यावासायिक स्तरावर मोठे योगदान असलेल्या व्यक्तीला त्याच्या पदावरून हटविण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असावा, अशी शक्यता तपन मिश्रा यांनी व्यक्त केली आहे.
त्याचसोबत तपन मिश्रा यांनी असंही लिहिलं आहे की, इस्त्रोमध्ये मोठ्या वैज्ञानिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातम्या मिळतात, १९७१ मध्ये प्रोफेसर विक्रम साराभाई यांचाही संशयास्पद मृत्यू झाला, त्यानंतर १९९९ मध्ये VSSC चे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांच्या मृत्यूवरही प्रश्न उपस्थित केले गेले, इतकचं नाही तर १९९४ मध्ये श्री नांबीनारायणचं प्रकरणही सगळ्यांसमोर आलं होतं, पण मला माहिती नव्हतं की, मी एक दिवस या रहस्याचा भाग बनेन असं ते म्हणाले.