पुणे (वृत्तसंस्था) भाजपची राज्यात पुन्हा सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे सांगत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या आपल्या वक्त्याव्याबाबत सारवासारव केली आहे.
मुंबईत झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शेलार यांनी कर्तृत्ववान मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली होती. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी शेलार आले होते त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे आदी उपस्थित होते. शेलार म्हणाले, कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवरील पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात मी त्यावर बोललो. समाजातील सर्व स्त्रिायांना उचित आणि सर्वोच्च स्थान मिळायला हवे या मताचा मी आहे. पुस्तकापुरताच तो विषय होता. राज्यात भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसच असतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे पळपुटे आणि पराधीन असल्याची टीका शेलार यांनी केली. तसेच जनतेच्या प्रश्नावर महाआघाडीच्या ठाकरे सरकारकडून पळ काढण्यात येते किंवा पराधीन आहोत, अस उत्तर देण्यात येते. प्रत्येक प्रश्नावेळी दुसऱ्याकडे बोट दाखवते. इतर राज्यात शेतकऱ्यांसह बलुतेदारांना आपल्या परीने मदत केली. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडून कुठलीही मदत करण्यात आली नाही. अकार्यक्षम सरकार असल्याचा ठपका शेलार यांनी ठेवला.