नागपूर (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गद्दारीचा आरोप केला. त्यानंतर भुयार चांगलेच संतापले असून आज दुपारी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करणार आहेत. मी महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं होतं. गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती संजय राऊत यांचा चुकतंय, असं ते म्हणाले.
काल संजय राऊत यांनी ज्या अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप केला, तेच देवेंद्र भुयार अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आज सायंकाळी ४.३० वाजता राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलत असताना भुयार म्हणाले, ‘मी विश्वास मताच्या वेळेलाही महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं होतं. गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती संजय राऊत यांचा चुकतंय, ते खूप मोठे नेते आहे मात्र असा आरोप करणे योग्य नाही. मी पहिल्या पसंतीचा मत संजय पवार व दुसऱ्या पसंतीचा मत संजय राऊत यांना दिलं. शिवसेनेचं नियोजन चुकलं, शिवसेनेचे उमेदवार मला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केलेला नाही. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या सूचना केल्या तर त्या प्रमाणे मतदान केलं’ असल्याचं स्पष्टीकरण देखील भुयार यांनी दिलं.
तसंच हे सर्व आपण पवारांना भेटून सांगणार आहे. प्रामाणिकपणे मतदान करूनही या पद्धतीने आमची बदनामी केली जाणार असेल तर हे योग्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार सोबत आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहे. त्यामुळे आमच्या बद्दल असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच अपक्षांना एकत्रित येऊन एक भूमिका घ्यावी लागेल. विचार करावा लागेल, हा एकट्या अपक्षावर दाखवलेला अविश्वास नाही तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे. मी भाजपला मतदान कधीच करणार नाही असं देखील ते यावेळी म्हणाले.
तसंच मुख्यमंत्री कधीच भेटत नाहीत, अनेक पत्र लिहूनही उत्तर देत नाहीत. हे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं आहे. मतदारसंघाची काम आम्ही राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना नाही तर मग काय पंतप्रधान मोदींनी जाऊन सांगणार का असा सवाल करत मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाही ही आमची खंत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.