ठाणे (वृत्तसंस्था) दंड न भरल्यास १ डिसेंबरपासून विशेष मोहीम राबवून गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. गाड्या ताब्यात घेण्यापासून ते गाडी परवाना निलंबनाचीही कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंडात्मक चलान फाडून वाहतूक पोलिसांनी वर्षभरात जवळपास २२ कोटी रुपयांची चलान फाडले आहेत.
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंडात्मक चलान फाडून वाहतूक पोलिसांनी वर्षभरात जवळपास २२ कोटी रुपयांची चलान फाडले आहेत. त्यात जवळपास १३ कोटी रुपयांची वसुली झाली नसून आता दंडाची प्रलंबित रक्कम भरण्यासाठी चालकांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम प्रलंबित असलेल्या चालकांवर केसेस करण्यात येतील. ही कारवाई करत असताना मोटार वाहन कायदा कलम २०७ अन्वये गाडी ताब्यात घेतली जाऊ शकते. तसेच गाडी परवाना निलंबनाची कारवाई होईल. या कारवाईने नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे मुदतीत नागरिकांनी दंडाची थकीत रक्कम भरण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाईचा आकडा मोठा असला तरी दंडाची रक्कम वसूल होत नाही. कारण, वाहन चालक दंडच भरत नाहीत. थकीत रकमेचा आकडा मोठा असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे दंडाची थकबाकी वसूल करण्यासाठी वाहतूक शाखेने प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या दहा दिवसांमध्ये प्रलंबित असलेल्या ई चलानची रक्कम भरण्याची मुदत चालकांना देण्यात येत आहे. अन्यथा १ डिसेंबरनंतर दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.