मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात दिला आहे.
देशभरात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. अशातच राज्याला पुरेशा लसीचा पुरवठा होत नसल्याने १ मे पासून होणाऱ्या व्यापक लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यास राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे राज्यासमोरील चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते. पण लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर सर्वांचं लसीकरण हाच पर्याय आहे. अशात लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
राज्यात आतापर्यंत १.५ कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण केलं जाणार आहे, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र एवढ्या सगळ्या नागरिकांचं लसीकरण करण्यास १ मे पासून आवश्यक लसी उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरीपर्यंत लसी कदाचित मिळू शकतात. त्यावेळी लसीकरण सुरु होऊ शकतं, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्याला दिवसाला ८ लाख डोसची गरज आहे. मात्र सध्या राज्याला १ लाख डोस मिळत आहेत. लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या तर येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करता येणे शक्य आहे. तेवढी सुविधा राज्यात उपलब्ध आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.