जळगाव दि. २५ प्रतिनिधी – कुठलाही खेळ खेळण्याच्या आधी मेंदूला ट्रेनिंग द्यावी लागते. ध्येय काय आणि मेंदू काय म्हणतो, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण पंचइंद्रियांकडून आलेली माहितीवर आपली कृती हेच अंतिम ध्येयाच्या दिशेने उचलेले पहिले पाऊल आहे. यासाठी बाहेरील नकारात्मक बाबींचा विचार मेंदू न येऊ देता त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे मनोगत प्रसिद्ध क्रीडा मानसशास्त्रज्ञ डॉ. मधुली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
जैन स्पोर्टस अकॅडमीतर्फे खेळाडू, पालक, प्रशिक्षकांसह मॅनेजमेंटमधील सहकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत त्या बोलत होत्या. डॉ. मधुली कुलकर्णी यांचे स्वागत अरविंद देशपांडे यांनी केले. अनुभूती स्कूलच्या योगशिक्षिका स्मिता बुरुकूल यांचासुद्धा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. मधुली कुलकर्णी यांची बहिण कल्याणी खोडके यांचे स्वागत रविंद्र धर्माधिकारी यांनी केले. जैन स्पोर्टस अकॅडमीचे हेड कोच सुयश बुरूकूल यांनी प्रास्ताविक करीत अकॅडमीतर्फे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. अरविंद देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करताना खेळाडूला घडविण्यासाठी पालकांची भूमिका याबाबत भाष्य केले.
डॉ. मधुली कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाल्या की, आपले ध्येय यानुसार आपला मेंदू कार्य करतो. मी खेळासाठी आहे किंवा नाही, प्रत्यक्ष स्पर्धांमध्ये यश न मिळणे, चांगले खेळलो तर मी चांगला, निवड चाचणीत दबाव येणे यासाठी खेळ खेळण्याच्या आधी मेंदूला विशिष्ट पद्धतीने प्रशिक्षण द्यावे लागते आणि ही प्रक्रिया दैनंदिन सरावातून होत असते. जिंकण्यासाठी खेळावे हे आपल्या विचारांमध्ये बिंबले जात असते मात्र जिंकण्यासाठीच खेळावे हा अहंभाव नसावा यातून प्रत्येक मॅच जिंकूच शकू असे नाही चांगले खेळणे आपल्या हातात आहे. त्यावर आपले नियंत्रण आहे मात्र हरणे आणि जिंकणे आपल्या हातात नाही. तुलनात्मक विचार टाळावे, एकमेकांशी स्पर्धा करणे टाळावे. आपल्या समोर आव्हाने येतात त्याला आपण समस्या म्हणून न पाहता सकारात्मक विचारांद्वारे त्याचा स्वीकाराव करावा.
मानसिकता प्रशिक्षण म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे?, आव्हाने आणि टिकांनी हादरून जाऊ नका त्यापासून शिका व तुम्हाला आकार द्या, सर्वात शक्तिशाली स्नायू मनाला बनवा असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या आवडीच्या गोष्टी झाल्या नाहीत तर क्रोध होतो त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. एखादा निर्णय आपल्या विरूद्ध जाऊ शकतो अशा परिस्थीत स्वत: तयार केले पाहिजे. स्वत:वर व आपल्या खेळावर खूप प्रेम आहे, असे वाटत असेल तर सराव करावा लागेल. ध्येय गाठताना बाहेरील नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. खेळाडूला केंद्रबिंदू मानून एक प्रकिया ठरले. कुटुंब, कोचिंग स्टाफ, खेळाडू, सपोर्ट स्टाफ, मॅनेजमेंट या सर्वांमधील समन्वयातूनच निरंतर यश प्राप्त होत असते. एकमेकांमधील संवाद हा पारदर्शक असावा, प्रत्येकाने आपली भूमिका काय हे ओळखावे, संवाद खुला असावा यातूनच कार्यपद्धती विकसीत होते. नियम, नातेसंबंध (रिलेशन्स), सिस्टीम्स, संवाद व्यवस्थित असेल तर आपण खेळाडू घडवू शकू असे त्यांनी सांगितले. मुलांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांची ध्येय ठरविली पाहिजे, स्वत:शी संवाद असतोच तो थांबवू शकत नाही; मात्र ते ध्येयपूर्तीसाठी सकारात्मक आहे की नकारात्मक हे पाहण्याची पालकांची, प्रशिक्षकांची, जबाबदारी आहे. आपल्या सादरीकरणा नंतर डॉ. मधुली कुलकर्णी यांनी खेळाडूंसह प्रशिक्षक व अन्य सपोर्ट स्टाफ यांची भूमिका यावर प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला.