मुंबई (वृत्तसंस्था) अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी आज पुराव्यानिधी सरकारी वकिलाने भाजप नेत्यांना कशा प्रकारे गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता याचा खुलासा केला आहे. तर, आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे, असा सणसणीत टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी लगावला आहे.
जे काही व्हिडिओज विधानसभा अध्यक्षांना दिलेत त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे. तसेच भाजपवर प्रत्यारोप करताना, त्यांनीही सत्तेचा दुरुपयोग करुन फोन टॅपिग केलं आहे. यंत्रणांचा दुरुपयोग करायची सवय भाजपची आहे. फडणविस सरकारपासून ही प्रथा पडलीय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच भाजपनं इक्बाल मिरचीकडून गोळा केलेल्या फंडिंगचंही उत्तर दिलं पाहिजे, असेही ते म्हणाले. फडणवीसांच्या आरोपांना उद्या गृहमंत्री याबाबत उत्तर देतील, या व्हिडिओची सत्यता तपासणे गरजेचे आहे. शरद पवारांसारख्या महत्वाच्या व्यक्तीवर आरोप आहे. त्यामुळे व्हिडिओची डबिंग झालेली असू शकते, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
तसेच पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, घरचे सिसीटीव्ही फुटेज कसे बाहेर आले? हे देखील तपासले पाहिजे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या विधानाबाबत विचारले असता, जर दाऊदसोबत व्यवहार झाला असेल तर नवाब मलिकांचा राजिनामा घेतलाच पाहिजे, याबाबत दुमत नाही, असे पुनरोच्चार त्यांनी केला आहे. विघातक शक्तींसोबत जे कुणी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. मात्र, इकबाल मिरचीच्या आरोपावरुन भाजपवरही कारवाई केली का जाऊ नये? असा सवालही त्यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेल्या महिला पोलीस अधिकारी सुषमा चव्हाण यांचा या प्रकरणात बोलण्यास नकार दिला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. मी आताचं काही स्पष्टीकरण देणार नाही. वरीष्ठ अधिकारी डीसीपी याॉसंदर्भात स्पष्टीकरण देतील, असे त्यांनी सांगितले आहे.