
जळगाव (प्रतिनिधी) – स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यावर वीजबिल न भरता परस्पर जोडणी घेणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत शुक्रवारी ४ ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात दोन दिवसांत आणखी ४ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले. लागोपाठ होणाऱ्या महावितरणच्या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
जळगाव शहरातील येथील नाथवाडा येथील रहिवासी सरूबाई तुकाराम पाटील या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीसाठी स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट (आपोआप खंडित) केलेला होता. मात्र त्यानंतरही त्याने थकबाकी भरली नाही. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता या ग्राहकाने अनधिकृतपणे वीज जोडल्याचे आढळले. या ग्राहकाने ७ हजार ७१० रुपयांची वीजचोरी केली. दुसऱ्या प्रकरणात जोशी कॉलनीतील मनीषा विनोद जोशी या ग्राहकाने थकबाकीसाठी स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा खंडित असतानाही अनधिकृतपणे वीज जोडून महावितरणचे तब्बल ४१ हजार ४२० रुपयांचे आर्थिक नुकसान केले. महावितरणचे सहायक अभियंता साजिद तडवी यांच्या फिर्यादीवरून या २ ग्राहकांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात २३ ऑगस्ट रोजी भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
तिसऱ्या प्रकरणात धरणगाव तालुक्यातील धार येथील रमेश देविदास बेलदार या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीमुळे स्मार्ट मीटरद्वारे खंडित करण्यात आलेला होता. मात्र या ग्राहकाने थकबाकी न भरता बेकायदेशीर वीज वापरून महावितरणचे ५ हजार ६२० रुपयांचे नुकसान केले. चौथ्या प्रकरणात धार इथल्याच अजय सीताराम बेलदार या ग्राहकाने वीजपुरवठा थकबाकीची खंडित असताना अनधिकृतपणे वीज जोडून वापरली. त्याने महावितरणचे ४ हजार ५१० रुपयांचे नुकसान केले. या दोन्ही प्रकरणांत कनिष्ठ अभियंता दीपक पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात २४ ऑगस्ट रोजी भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी आपली वीजबिले तातडीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केला आहे. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणी करण्यासाठी महावितरणने पथके स्थापन केली आहेत. वीजपुरवठा परस्पर जोडल्याचे या पथकांना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. तसेच अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडल्यास प्राणांतिक अपघाताचाही धोका आहे. त्यामुळे वीजपुरवठा अनधिकृतरीत्या जोडू नका. वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनीही अनधिकृतरीत्या वीजपुरवठा देऊ नये. नसता त्यांचाही वीजपुरवठा खंडित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणने कळवले आहे.
















