जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असून १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवकाला लसीकरणाची संधी मिळत आहे. महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या आगामी काही महिन्यांमध्ये होणार आहेत. त्यामुळे नियमांमध्ये शिथिलता आणून तात्काळ बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे पंधरा लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेदरम्यान या संपूर्ण विद्यार्थ्यांचे आरोग्य कसे जपले जाईल..? व या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाची बाधा होणार नाही, यासंबंधीची काळजी कशी घेता येईल..? याबद्दल आज जळगाव जिल्हा एन एस यु आय संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दूरध्वनीवरून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे वय हे अठरा वर्षे पूर्ण झालेले नसते. १८ वर्ष पूर्ण वयाच्या नियमांमध्ये जर महाराष्ट्र सरकारने शिथीलता आणल्यास तसेच बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र जर परीक्षेच्या दीड महिने आधी उपलब्ध करून दिले तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्याकरिता प्रवेश पत्रकाच्या आधारावरती या संपूर्ण विद्यार्थ्यांचे तात्काळ दोन्ही डोस देऊन लसीकरण करता येईल. म्हणजेच आगामी काळामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाचा कुठलाही धोका राहणार नाही.
दोनदा द्यावी लागणार बारावीच्या विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून परीक्षा…! पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
महाराष्ट्र राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीची बोर्डाच्या परीक्षेसाठी एकवेळेस व बारावीची बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी लागणारी प्रवेश परीक्षा देण्याकरता परत एक वेळेस परीक्षा केंद्रावरती जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे दोन वेळेस आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावरती जाऊन परीक्षा द्यावी लागत असल्यामुळे व कोरोनाचा आहाकार बघता संपूर्ण पालकांमध्ये अतिशय चिंतेचं वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोणाच्या या महामारी मध्ये आपल्या पाल्याचा जीव कसा वाचवावा..? याबाबत चिंता पालकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे.
त्या अनुषंगानेच आज जळगाव जिल्हा एन एस यु आयच्यावतीने आरोग्य मंत्री यांच्याकडे मागणी केली की, वयाच्या नियमांमध्ये शिथिलता आणून बारावीच्या विद्यार्थ्यांची तात्काळ लसीकरण करावे जेणेकरून पालकांमध्ये निर्माण झालेलं चिंताग्रस्त वातावरण हे दूर होईल व आपल्या राज्यातील बारावीचा विद्यार्थी हा कोरोना बाधित होण्यापासून वाचेल.
आरोग्य मंत्र्यांचे लसीकरणाबाबत सकारात्मक आश्वासन
वयाची शिथिलता आणून बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे या मागणीबाबत आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी मागणी करणारे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना “मला तात्काळ आपण पत्र द्यावे व मी लगेच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेतो व पुढील प्रक्रिया सुरू करतो याबाबतचे सकारात्मक आश्वासन दिले.