जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अयोध्यानगरमध्ये स्क्रॅप केलेल्या मटेरिअलचा रस्त्यासाठी पुनर्वापर करण्यात आला आहे. तसेच खडीकरण न करताच स्क्रॅप मटेरीअलवर मुरूम टाकून दबाई होत असून अंदाज पत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी याबाबत पीडब्लूडीच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार केली आहे.
अयोध्यानगरातील हॉटेल जान्हवी समोरील रस्त्याचे काम दीड महिन्यापासून सुरू आहे. पूर्वी या रस्त्यांचे डांबरीकरण झाले होते. परंतु, अमृत योजनेच्या कामामुळे रस्ता पूर्ण खराब झाला होता. दरम्यान, ३८ कोटींच्या निधीतून मंजूर स्क्रॅपींग रस्त्याचे करण्यात महिनाभरापूर्वी आले होते. स्क्रॅपींग केलेले मटेरिअल उचलून न नेता त्याच ठिकाणी रस्त्यावर पसरवण्यात आले होते. दरम्यान, रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरूवात केल्यानंतर स्क्रॅप केलेले मटेरिअल न उचलता तसेच खडीकरण न करता त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे.
मक्तेदारामार्फत मुरूम टाकण्याचे काम सुरूच असल्याने शिंदे यांनी शुक्रवारी पीडब्लूडी कार्यालय गाठले. अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेत रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रकाची मागणी केली. कामाला सुरूवात करण्यापूर्वी काम कोणत्या योजनेतून आहे. किती खर्च होणार आहे. मक्तेदार कोण? आदीची माहिती असलेले फलक लावलेले नाही. रस्त्याच्या गुणवत्तेचा विचार होत नसल्याची तक्रार केली.