बोदवड (प्रतिनिधी) बोदवड रेल्वे स्थानकावर सेवाग्रामसह इतर रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. यासाठी जवळपास ४०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. नेमके याच दिवशी बोदवड- ते मुक्ताईनगर उड्डाण पुलावरुन वाहतूक सुरु करण्यासाठी राजकारणही रंगले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा उड्डाणपूल सकाळी १०:३० वाजता वाहतुकीसाठी सुरु केला. मात्र हा पूल तासाभरात ११:३० वाजता पुन्हा बंद करण्यात आला. याबाबत चर्चा अशी रंगली होती की, पूल सुरु करण्यात आला ही बातमी समजताच खासदार रक्षाताई खडसे यांनी उदघाट्न न करता पूल कसा सुरु केला?, ही विचारणा करत ही वाहतूक पुन्हा बंद करायला लावली. आपण वाहतूक सुरु करून दिलेला पूल पुन्हा बंद करण्यात आला. हे समजताच आमदारांनी पुन्हा नांदगाव येथे येऊन या दुपारी ३:३० चे सुमारास येऊन पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यास भाग पाडल्याचे कळते.
बोदवड रेल्वे स्थानकावर अनेक गाड्यांना थांबा देण्यात आला होता. पण कोरोना काळापासून सेवाग्रामसह चार गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला. याबाबत प्रवासी व अनेक संघटनांनी वेळोवेळी निवेदन दिले पण काही एक उपयोग झाला नाही. शेवटी आज त्याचा उद्रेक झाला आणि आज पोलिस बंदोबस्त आंदोलन झाले. त्यामुळे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे ही उपस्थित होते. त्यावेळी बोदवड- मुक्ताईनगर रेल्वे उड्डाणपुलावर नागरिक व वाहनांची एकच गर्दी झाली. त्यावेळी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना पोलिसांनी लावलेले बॅरिकेडस् काढण्यास सांगत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला.
याबाबत दुपारी रेल्वेचे विभागीय अधिकारी यांच्या आदेशाने सदर ठेकेदार यांनी पुलावरील वाहतूक बॅरिकेडस् लावून बंद करायला लावली. आपण सुरु केलेली वाहतूक बंद करायला लावल्याचे कळताच आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा मुक्ताईनगरहून बोदवडच्या उड्डाण पुलावर पोहचले आणि रेल्वे अधिकारी व ठेकेदाराला विचारणा केली. आपण पुलाचे काम पूर्ण केल्याचे ठेकेदाराने सांगितले. यानंतर आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा बॅरिकेडस् बाजूला केले आणि पुल पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला. या उड्डाणपुलावरील राजकारणाची बुधवारी दिवसभर चर्चा सुरु होती.
याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता सदर उड्डाणपूल आपण नागरिकांना येत असलेल्या अडचणीची जाणीव ठेऊन वाहतूक सुरू केली. परंतु नंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा पूल बंद केला?, हा प्रकार निंदनीय असून श्रेयासाठी नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर याबाबत खा. रक्षाताई खडसे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.