पुणे (वृत्तसंस्था) दिवसेंदिवस देशातील बेरोजगारी वाढू लागली आहे. या बेरोजगारीमुळे नागपूरमधील एका तरुणाने त्याचं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. त्याचा मृतदेह पुण्यातील खडकवासला धरणावरील पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हवेली पोलीस आणि पुणे महानगर पालिकेच्या प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी या तरुणाचा मृतहेह धरणातून बाहेर काढला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता घडली.
संजय मारुती नाईक (वय २७) असं या तरुणाचं नाव आहे. तो मुळचा नागपूरचा होता. तो बेरोजगारीमुळे नैराश्यात होता. त्यामुळे तो २५ जानेवारीला घरातून निघून गेला होता, अशी माहिती संजयचा मोठा भाऊ नरेंद्र नाईकने सांगितलं. नरेंद्रने दोन दिवस संजयचा शोध घेतला. मात्र, संजय कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर नरेंद्रने उत्तम नगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर तब्बल तीन दिवसांनी २८ जानेवारीला दुपारच्या सुमारास खडकवासला धरण शाखेतील स्थापत्य अभियांत्रिकी दत्तत्रय कापसे, कर्मचारी वसंत ठाकर, सागर कडू आणि विष्णू धोंगडे यांनी धरणाच्या भिंतीजवळ मृतदेह तरंगत असताना दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती कळवली. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मल्हारी राऊन यांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं आणि संजयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला. उत्तम नगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.