नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र गेल्या २४ तासांत १ लाख ३४ हजार १५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २ हजार ८८७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ३४ हजार १५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून २८८७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख ११ हजार ४९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात १ लाख ३२ हजार ७८८ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर ३२०७ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
आज देशात सलग २१व्या दिवशी कोरोनाची लागण झालेल्यांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. २ जूनपर्यंत देशात २२ कोटी १० लाख ४३ हजार ६९३ कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात २४ लाख २६ हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण ३५ कोटी ३७ हून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात २१.५९ लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ६ टक्क्यांहून अधिक आहे.
आजची देशातील कोरोना स्थिती
एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी ८४ लाख ४१ हजार ९८६
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी ६३ लाख ९० हजार ५८४
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : १७ लाख १३ हजार ४१३
मृतांचा एकूण आकडा : ३ लाख ३७ हजार ९८९
राज्यातली स्थिती
राज्यात काल (बुधवारी) तर १५,१६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल २९,२७० कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल २८५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट आहे. राज्यात काल एकूण २,१६,०१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.