नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ७ हजारांनी घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ३१ हजार २२२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २९० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
देशात गेल्या २४ तासांत ३१ हजार २२२ बाधितांची नोंद करण्यात आली असून २९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ४२ हजार ९४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही रुग्णसंख्या कमी असण्याचं कारण केरळमधील रुग्णसंख्येत झालेली घट आहे. केरळमध्ये गेल्या २४ तासांत १९ हजार ६८८ रुग्ण आढळले असून १३५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नवीन रुग्णसंख्येसह देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी ३० लाख ५८ हजार ८४३ वर पोहोचली आहे.
देशात सध्या ३ लाख ९२ हजार ८६४ रुग्ण उपचाराधिन आहेत. गेल्या अनेक दिवसांनंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाखांच्या खाली आली आहे. यासोबत कोरोनातून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी २२ लाख २४ हजार ९३७ झाली आहे. तर, आतापर्यंत ४ लाख ४१ हजार ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.४८ टक्क्यांवर आहे. देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.५६ टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी रेट २.५ टक्क्यांवर आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात १ कोटी १३ लाख ५३ हजार ५७१ जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ६९ कोटी ९० लाख ६२ हजार ७७६ जणांचं लसीकरण पूर्ण झाले आहे.