नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ५ हजारांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ३१ हजार ९२३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २८२ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३१ हजार ९२३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून २८२ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी ३५ लाख ६३ हजार ४२१ वर पोहोचली आहे. तर, मृतांची संख्या ४ लाख ४६ हजार ५० झाली आहे. गेल्या २४ तासांत ३१ हजार ९९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. यासह आतापर्यंत ३ कोटी २८ लाख १५ हजार ७३१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात गेल्या २४ तासांत ७१ लाख ३८ हजार २०५ जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ८३ कोटी ३९ लाख ९० हजार ४९ जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात बुधवारी दिवसभरात ४ हजार २८५ जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत राज्यात ६३ लाख ४९ हजार ०२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात ३ हजार ६०८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ४८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या एकूण ३९ हजार ९८४ कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ३१ हजार २३७ झाली आहे.
















