नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ३३ हजार ३७६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३०८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
गेल्या २४ तासांमध्ये देशात ३३ हजार ३७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ९१ हजार ५१६ झाली आहे. तर काल दिवसभरात ३२ हजार १९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी २३ लाख ७४ हजार ४९७ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या ७८ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक दर सातत्याने तीन टक्क्यांच्या खालीच आहे. देशात काल दिवसभरात ३०८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोविड आजारामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या आता चार लाख ४२ हजार ३१७ वर पोहोचली आहे.
देशात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता ७३ कोटी ५ लाख ८९ हजार ६८८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ६५ लाख २७ हजार १७५ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.
राज्यातील स्थिती
राज्यात शुक्रवारी ४,१५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ५२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९१ हजार १७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के आहे. गुरुवारी ४४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा एकूण मृत्यूदर २.१२ टक्के इतका झाला आहे.
















