नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत दीड हजाराने घट झाली. गेल्या २४ तासांत ४० हजार १३४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ४२२ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३६,९४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४०,१३४ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ४२२ कोरोनाबाधितांचा मृत्य झाला आहे. ३६,९४६ रुग्णांनी कोरोनावर मात करुन ते घऱी परतले आहेत. देशात केरळमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही आहे. सहाव्या दिवशीही केरळमध्ये २० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत केरळमध्ये, कोविडची २०,७२८ नवीन बाधितांची नोंद झाल्याने एकूण संक्रमित लोकांची संख्या ३४,११,४८९ झाली. त्याचबरोबर, आणखी ५६ रूग्णांच्या मृत्यूनंतर, करोनामुळे मृतांची संख्या १६,८३७ वर पोहोचली आहे. २७ जुलैपासून केरळमध्ये कोरोनाची १,२८,३७३ प्रकरणे नोंदली गेली आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १ ऑगस्टपर्यंत देशभरात कोरोना लसीचे ४७ कोटी २२ लाख डोस देण्यात आले आहेत. रविवारी १७ लाख लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) मते, आतापर्यंत ४६ कोटी ९६ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. रविवारी सुमारे १४ लाख कोरोना नमुने चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.