नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अभिनेत्री कंगना रनौतने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशात मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद कमी झाला असताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात बोलताना अय्यर यांनी २०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे, असे वक्तव्य केले आहे.
इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात अय्यर म्हणाले की, “गेल्या ७ वर्षात आपण पाहत आहोत की, पक्षांतराची कोणतीही चर्चा होत नाही. शांततेची चर्चा नाही. ते अमेरिकन लोकांचे गुलाम बनून बसले आहेत आणि ते म्हणतात चीनपासून वाचलं पाहिजे. भारत-रशियाचे संबंध वर्षानुवर्षे जुने आहेत, पण मोदी सरकार आल्यापासून हे नाते कमकुवत झाले आहे, असे अय्यर सांगत होते. मणिशंकर अय्यर म्हणाले की, २०१४ पर्यंत रशियाशी आमचे जे संबंध होते, ते खूपच कमी झाले आहेत.
यापूर्वी मणिशंकर अय्यर यांनी मध्ययुगीन इतिहासाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. ते म्हणाले होते, “अकबरने देशावर ५० वर्षे राज्य केले. हे लक्षात घेऊन मी राहत असलेल्या रस्त्याचे नाव अकबर रोड असे ठेवले. आमची हरकत नव्हती. महाराणा प्रताप रस्ता बनवा असे आम्ही कधीच म्हटले नाही, कारण आम्ही अकबराला आपलाच मानतो आणि त्याला परकं मानत नाही.