नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात भारताने एक मोठी कामगिरी साध्य केली आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार केला आहे आणि या निमित्ताने देशभरात साजरा करण्याची तयारी केली जात आहे. या अंतर्गत देशभरात कार्यक्रम आयोजित करून ज्यांनी लसीकरणासाठी योगदान दिले त्यांना कृतज्ञता व्यक्त केली जाईल.
देशासह जगभरामध्ये सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील लढाईमध्ये भारताने आज ऐतिहासिक यश मिळवले आहे. भारताने आज कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये १०० कोटींचा आकडा गाठला आहे. जानेवारी महिन्यामध्ये १६ तारखेपासून भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला आरोग्य यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेल्या या लसीकरणामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व वयोगटांचा समावेश करण्यात आला. दरम्यानच्या काळात लसींची टंचाई, लसीबाबत पसरलेल्या अफवा, शंका अशा सर्व अडचणींवर मात करत भारतातील आरोग्य यंत्रणा, केंद्र आणि राज्य सरकारमधील नियोजनांच्या माध्यमातून भारताने १०० कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा ऐतिहासिक मैलाचा दगड भारताने गाठला आहे.
जानेवारी २०२० मध्ये भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने देशव्यापी लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. दरम्यान, १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यावेळी कोविड योद्धे असलेल्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. १ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली होती. तर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने कोरोना लसीकरणाचे १०० कोटींचा टप्पा पार करून आज इतिहास रचला आहे. या निमित्ताने त्याची घोषणा सर्वत्र केली जाणार आहे. एकाचवेळी लाऊड स्पीकरवरुन विमान, जहाज, बंदर, मेट्रो, रेल्वे स्टेशन, बस स्टँड याची उद्घोषणा होणार आहे. भारताने १०० कोटी डोसचा ऐतिहासिक टप्पा ओलांडताच भाजपा कार्यकर्त्यांकडून महाजल्लोष साजरा केला जाणार आहे. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव केला जाईल. विमान कंपनी स्पाइस जेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह १०० कोटी लस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पोस्टर विमानावर लावणार आहे.