जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळात २०२० मध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जमाव जमवून कोरोना नियमांचा भंग केल्याच्या आरोपातून दाखल गुन्ह्यातून गुप्ता यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
२०२० मध्ये दीपककुमार पी. गुप्ता यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कोविड नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप करून दीपककुमार गुप्ता यांच्याविरुद्ध तहसील प्रशासनाकडून जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जळगावचे तत्कालीन नायब तहसीलदार हेमंत भागवत पाटील हे फिर्यादी होते. याप्रकरणी न्यायालयात कामकाज पूर्ण झाले असून, न्यायालयाने दीपक गुप्ता यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आरोपीतर्फे अॅड. किरण शिरसाठ यांनी काम पाहिले. वाळू प्रश्नासह इतर प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरल्याने हा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. तसेच या प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला असून, तत्कालीन तहसीलदार वैशाली हिंगे व प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांची चौकशी करण्याची मागणी गुप्ता यांनी केली.