जळगाव (प्रतिनिधी) उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी २००८ मध्ये रत्नागिरीतल्या खेडमध्ये राज ठाकरेंना (Raj Thakare)अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसे पदाधिका-यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात आज राज ठाकरे यांच्यासह मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस अँड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी, यासाठी मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद 21 ऑक्टोबर 2008 रोजी संपूर्ण राज्यासह जळगावतही उमटले होते. याप्रकरणी राज ठाकरेंसह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात वॉरंट बजावल्यानंतर न्यायालयाने राज यांना 15 हजारांचा जामीन मंजूर केला होता. तसेच या खटल्याच्या कामात कायमची गैरहजर राहण्याची परवानगीही दिली होती. दरम्यान, सुनवाईअंती आज जळगाव न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात मनसेच्या वतीने अॅड. संदीप पाटील यांनी कामकाज बघितले.