मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेणार आहेत. या निर्णयाविरोधात मी हाय कोर्टात आव्हान करणार आहे” असे ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे.
अंजली दमानिया यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांना सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषमुक्त करण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला मी उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, असे दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबई सत्र न्यायालाच्या या निकालानंतर नाशिकमध्ये आनंदोत्सव साजरा केला. पेढे वाटले. या कार्यकर्त्यांनी अंजली दमानिया यांच्या पवित्र्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आता कोणीही कोणत्या कोर्टात गेले तरी काही फरक पडत नाही. कारण सत्य हे कोणत्याही कोर्टात सारखेच असते. त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो, अशा प्रतिक्रिया भुजबळ समर्थक व्यक्त करत आहेत.