मुंबई (वृत्तसंस्था) स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 या वर्षात वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम या घटकांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या घटकांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. त्यानुसार सर्व उपंगामध्ये अत्यंत कमी प्रगती असलेल्या जिल्हयांचा आढावा घेण्यात यावा. जेणेकरुन अभियानाला गतिमानता प्राप्त करुन माहे मार्च 2024 अखेरीस राज्य हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अतंर्गत विविध विषयाच्या अनुषंगाने पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावरील आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह, येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, राज्य पाणी व स्वच्छता मिशन अभियान संचालक तथा सहसचिव, शेखर रौंदळ, कार्यकारी अभियंता, श्रीम. अपुर्वा पाटील, अवर सचिव, श्री.चंद्रकांत मोरे, अवर सचिव, श्री.स्मिता राणे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अतंर्गत विविध उपांगांना गतिमानता प्राप्त होण्यासाठी प्रकल्प संचालक जल जीवन मिशन या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हास्तरावरुन अभियानाचा आलेख उंचविण्यासाठी कार्यवाही करणे आवश्यक आहे. सन 2024-25 या वर्षात राज्य हागणदारीमुक्त अधिक घोषित करावयाचे असले तरी यावर्षाच्या माहे मार्च 2024 अखेरीस राज्य हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करावे, तर माहे डिसेंबर 2023 अखेरीस 50 टक्के गावे मॉडेल म्हणून घोषित करण्यात यावे.
इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्याचा मॉडेल गावे घोषित करण्याचा आलेख वाढविणे गरजेचा आहे. त्यामुळे विहित कालावधीमध्ये राज्य हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी सर्व उपांगाची कामे पूर्ण करुन केद्र शासनाच्या संकेत स्थळावर नोंदित करावीत. जेणेकरुन, देशात महाराष्ट्र राज्याची मान उंचावेल. तसेच अभियान गतीमान करुन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीपर्यंत लोकचळवळ उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या सूचना मंत्री .श्री पाटील यांनी दिल्या.