जळगाव (प्रतिनिधी) कोकण भागातील पूरग्रस्तांची स्थिती अत्यंत भयानक आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी अत्यंत कठीण काळजाचे आहेत. त्यांनी पाहणी केली मात्र कोणतीही मदत अद्यापही दिली नाही. पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली हे दुर्दैव आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. ते जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.
जळगाव मराठी पत्रकार संघातर्फे पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. मदत घेऊन जाणाऱ्या वाहनास गिरीश महाजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, कोकण भागातील पूरग्रस्तांची स्थिती अत्यंत भयानक आहे. आपण त्या ठिकाणी चार दिवस होतो. लोकांचे सर्वच वाहून गेले आहे. त्यांचे अंगावरचे कपडे तेवढे शिल्लक आहेत. त्यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे. सामाजिक संस्था, आमच्या पक्षातर्फे मदत सुरू झाली आहे. मात्र शासनाची मदत अद्यापही मिळाली नाही.
राज्यातील सत्ताधारी अत्यंत कठीण काळजाचे आहेत. त्यांनी पाहणी केली मात्र कोणतीही मदत न करता तोंडाला पाने पुसली आहेत. शासनाने पंचनामे करण्याची वाट न पाहता तातडीने पूरग्रस्तांना मदत करण्याची गरज आहे. शिवाय त्या ठिकाणी प्रशासन यंत्रणा गतिमान करण्याची गरज आहे. प्रशासन पातळीवर सर्व दिरंगाई सुरू आहे. आम्ही त्या ठिकाणी जावून मदत केली. मात्र त्यावेळी कोणतीही शासकीय यंत्रणा पोहचली नव्हती. शासनाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरू आहे. आजपर्यंत आपण असे शासन कधीच पाहिले नव्हते, असा टोलाही महाजन यांनी लगावला.