रत्नागिरी (वृत्तसंस्था) भाजपमध्ये एकाधिकारशाही नाही आणि कधीच नव्हती. एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे.भाजपमध्ये एकाधिकारशाही असल्याचा भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी पलटवार केला आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग करत असल्याची घोषणा करत असतानाच भाजपमध्ये हल्लीच्या काळात एकाधिकारशाही निर्माण झाल्याचा आरोप केला होता. पूर्वी सामूहिक निर्णय घेतले जायचे आता केवळ देवेंद्र फडणवीस निर्णय घेतात आणि ते पक्षावर लादले जातात, असं खडसे म्हणाले होते. त्याला प्रसाद लाड यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. भाजपमध्ये एकाधिकारशाही नाही. हे खडसेंनाही माहीत आहे. त्यामुळे एकाधिकारशाही काय असते हे ज्या पक्षात जात आहेत. तिथे कळेलच, असं लाड म्हणाले. खडसे ज्या पक्षात जात आहेत. त्या पक्षाचा पूर्व इतिहास आणि पक्षातील एकाधिकारशाही अनुभवावी त्यानंतर जनतेसमोर येऊन सल्ला देण्याचं काम करावं, असा टोलाही त्यांनी लगावला.
खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांच्यावर किंवा भाजपवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन करावं. एखाद्याची स्वप्न जर त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील तर त्याला कोणीच आळा घालू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आरोप करणं नेहमी सोपं असतं. ते सिद्ध करणं तेवढंच कठिण असतं. आता फक्त भाजप नेतृत्वावर टीका करण्यासाठी खडसेंचा राष्ट्रवादीत उपयोग होऊ नये. त्यांना मंत्रिपद मिळावं पण फक्त भाजपवर आरोप करण्यासाठी त्यांना पक्षात घेतलं जाऊ नये. त्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी करण्यात यावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
















