जळगाव (प्रतिनिधी) जुन्या वादातून समता नगरातील अरुण बळीराम सोनवणे (वय २८,रा. समता नगर) या तरुणाचा रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चॉपरने वार करून गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाच संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अशोक महादु राठोड (रा.झाकिर हुसैन कॅालनी,संत गाडगेबाबा चौक, जळगाव), या संशयिताला ताब्यात घेतले आहे.
खून झालेल्या अरुण सोनवणे सोबत योद्धा उर्फ पिंट्या या संशयीताच्या पुतणीचे लग्न ठरले होते. या लग्नास योद्धा उर्फ पिंट्या याचा विरोध होता. यातूनच अरुणचा खून झाला होता. अटक करण्यात आलेल्या अशोक महादू राठोड यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातील नेपानगर येथून अटक केली आहे.
तत्पूर्वी एलसीबीचे पो.नि. किसन नजन-पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कुलदीप उर्फ सोनू आढळे याला विसरवाडी जवळून ताब्यात घेतले होते. तर आता एमआयडीसी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, किशोर पाटील, नाना तायडे, किरण पाटील, रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हेमंत कळस्कर, विजय जाधव आदींनी त्याला ताब्यात घेत रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलिस करत आहेत.