जळगाव (प्रतिनिधी) : शहरात अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण झाले असून येत्या १५ दिवसात वॉटर मीटर बसविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर टप्या टप्प्याने एक एक झोनमध्ये मीटर बसवल्यानंतर पाणीपट्टीची आकारणी करण्यात येणार आहे. त्यात साधारणतः १ हजार लिटरसाठी ६ रुपये कर आकारण्यात येईल, असा अंदाज मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
जळगाव शहरात चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे मनपा प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी शहरातील अमृत योजनेच्या जलवाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने ९० हजार वॉटर मीटर खरेदी केले असून लवकरच मीटर बसविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाच्या प्रकल्प विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. शहरातील रायसोनीनगर पासून वॉटर मीटरबसविण्याची सुरुवात होणार असून नागरिकांना १००० लिटर पाण्यासाठी ६ रुपये दर आकारणी केली जाणार आहे. जेव्हढे पाणी वापरले तेव्हढे पैसे यापुढे आकारणी होणार असल्यामुळे पाणी वाया घालवणाऱ्यांना चाप बसणार आहे.
पाच जणांच्या कुटुंबाला २ हजार बील
सध्या जळगाव शहरात एका कुटुंबाला अर्धा इंची कनेक्शनअसेल तर, सरसकट २ हजार रुपये पाणी पट्टी आकारणी केल जाते. यापुढे देखील ५ जणांच्या कुटुंबाला साधारण २ हजार रुपन पाणीपट्टी येईल असे नियोजन करण्यात येत आहे. परंतु लहान कुटुंब असेल आणि त्यांचा पाणी वापर कमी असेल तर, अशा कुटुंबांना पाणी पट्टी कमी येईल मात्र, मोठं कुटुंब असेल आणि जास्त पाणी वापरत असतील तर, दोन हजारापेक्षा जास्त पाणीपट्टी येणार आहे.
एका जणाला दररोज १३५ लिटर पाणी
एका व्यक्तीला एका दिवसाला १३५ लिटर पाणी दिले गेले पाहिजे, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार एका जणांला वर्षभरात ४९ हजार २७२ लिटर पाणी देण्यात येणार असून पाच जणांचे कुटुंब असल्यास त्यांना वर्षभरात २ लाख ४६ हजार ३७५ लिटर पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळेपाच व्यक्तींचे कुटुंब लक्षात घेता १००० लिटर पाण्यासाठी ६ रुपये आकारणी करण्यात येईल, असा अंदाज मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येवून धोरण ठरविण्यात येणार आहे.
इतर शहरांचा विचारकरून होईल आकारणी
दरम्यान, पुणे आणि मुंबईसह इतर शहरात देखील ६ रुपयांपासून ते १२ रुपयांपर्यंत पाण्याचे दर आकारले जाणार जात आहेत. त्यामुळे ज्या शहरांमध्ये वॉटर मीटरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अशा शहरांमधील नगरपालिका व महापालिकांचा आभ्यास करून पाण्याचे दर ठरविले जाणार आहेत, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शहरात ८५ हजार नळ कनेक्शन
जळगाव शहरात सध्या ८५ हजार नळ कनेक्शन आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने वाढीव नळ कनेक्शन गृहीत धरुन ९० हजार वॉटर मीटर खरेदी केले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० हजार मीटर उपलब्ध होणार आहेत. मीटर उपलब्ध झाल्यानंतर वेगवेगळ्या झोन नुसार हे मीटर बसविण्यात येणार आहेत. जो पर्यंत संपूर्ण शहरात मीटर बसविले जात नाही तो पर्यंत मीटरनुसार दर आकारले जाणार नाही. मीटर बसविण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर सर्वांना वॉटर मीटर नुसार दर आकारणी केली जाणार आहे.














