जळगाव (प्रतिनिधी) नवरात्रोत्सवातील नवमीच्या कार्यक्रमासाठी कुटुंबियांसह गावाकडे गेलेल्या सुजित रुपसिंग पाटील (वय ५५, रा. इंद्रनिल सोसायटी, पिंप्राळा) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. याठिकाणाहून ४० हजारु रुपयांच्यासह सोन्याचे दागिन्यांसह तांबे पितळ्याच्या भांड्यांसह गॅस हंडी असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवार दि. १२ रोजी घरी आल्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील इंद्रनिल सोसायटीमध्ये सुजित रुपसिंग पाटील हे वास्तव्यास आहे. दि. ११ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी नवरात्रोत्सवानिमित्त नवमीचा कार्यक्रम असल्याने ते कुटुंबियांसह पिंपळकोठा येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून दि. १२ रोजी सकाळ पाटील कुटुंबिय घरी आले असता, त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी लागलीच घरात जावून पाहणी केल्यानंतर त्यांना बेडरुममधील कपाटातील सामान घरात अस्ताव्यस्त पडलेला होता. तर कपाटात ठेवलेले रोकड आणि सोन्याचे दागिने त्यांना दिसून आले नाही. चोरट्यांनी सुजित पाटील यांच्या घरातून १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, हजार रुपयांचे पितळाचे भांडे आणि १ हजार रुपयांचे गॅस सिलेंडर आणि ४० हजारांची रोकड असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
गावाला गेलेले असतांना घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी पाटील यांच्या घरात डल्ला मारला. घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर सुजित पाटील यांनी घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर सुजित पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे हे करीत आहे.