जामनेर (प्रतिनिधी) शालार्थच्या फाईलवर चार महिने उलटूनही शिक्षण उपसंचालक स्वाक्षरी करुन मंजुरी देत नाहीये. शिक्षण उपसंचालकांच्या याच जाचाला कंटाळून जामनेर येथील एकलव्य या शिक्षण संस्थेत नोकरी असलेल्या एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. संबंधित शिक्षकाची प्रकृती नाजूक असल्याचे कळते.
शालार्थची फाईल प्रलंबित असल्यामुळे काम करुनही संस्थेकडून त्याचा मोबादला मिळत नाहीये. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही शिक्षण उपसंचालकांकडून फाईल मंजुर न करता त्रास दिला जात असल्याने या छळाला कंटाळून जामनेर तालुक्यातील एकलव्य या शिक्षण संस्थेत नोकरी असलेल्या भारत बाबुलाल रेशवाल शिक्षकाने शनिवारी विषारी पदार्थ खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच प्रकार लक्षात आल्याने कुटुंबियांनी त्यांना भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या रेशवाल यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान कागदपत्रांची पूर्तता करुनही शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याच्यांकडून रेशवाल यांची फाईल कोणत्या कारणाने अडविण्यात आली आहे?, या मागे नेमका त्यांचा उद्देश काय?, शिक्षकाचा जीव गेल्यावर उपसंचालक फाईलवर स्वाक्षरी करतील काय? असाही प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
सात वर्ष कायदेशीर लढा दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने शाळेत पुन्हा रुजू
भारत रेशवाल यांची पत्नी अंकिता रेशवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जामनेर येथील एकलव्य शिक्षण संस्था व संस्थेत कार्यरत शिक्षक भारत बाबुलाल रेशवाल यांच्या वाद होता. त्यामुळे रेशवाल यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तब्बल सात वर्ष कायदेशीर लढा दिल्यानंतर रेशवाल यांना न्याय मिळाला. उच्च न्यायालयाने रेशवाल यांना शाळेत पुन्हा रुजू करुन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२० रोजी भारत रेशवाल पुन्हा शिक्षक म्हणून एकलव्य शिक्षण संस्थेत रुजू झाले. रूजू झाल्यानंतर शालार्थ संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करत रेशवाल यांनी स्वतः प्रस्ताव शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याकडे जमा केला.
तब्बल चार महिन्यांपासूनच फाईल पडून
तब्बल चार महिन्यांपासून ही फाईल शिक्षण उपसंचालक उपासनी यांच्याकडे पडून आहे. इतर फाईलवर उपासनी यांनी मंजूरी दिली मात्र रेशवाल यांच्या फाईल अडकवून ठेवली आहे. फाईल प्रलंबित असल्याने रेशवाल यांना नोव्हेंबरपासून संस्थेकडून वेतनापोटीचा एक रुपयाही मिळालेला नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यात रेशवाल यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन शिक्षण उपसंचालक उपासनी यांच्याकडून त्रास दिला जात असून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासाठी उपासनी यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप देखील अंकिता रेशवाल यांनी केला आहे.
आपल्याकडून कोणतीही अडवणूक नाही : उपासनी
संबंधित शिक्षक आणि संस्थेचा वाद होता. न्यायालयाच्या आदेशाने ते पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. निलंबित काळातील पगाराची भरपाई संस्थेने द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता झाल्याबरोबर सेवेत पुन्हा हजर झाल्यापासूनचा त्यांचा पगार तात्काळ सुरु करण्यात येईल. रेशवाल यांची कुठल्याची प्रकारची अडवणूक करण्यात आलेली नाहीय.