मुंबई (वृत्तसंस्था) गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला होता. तसेच मानहानीच्या खटल्यासंदर्भात चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. आज जावेद अख्तर यांच्या वकिलांनी कोर्टात आपली बाजू मांडली आणि त्याची दखल घेण्याची विनंती केली. सुनावणीनंतर कोर्टाने जुहू पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आणि १६ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
या संवेदनशील प्रकरणात माझा संबंध नसताना माझ्यावर धांदात खोटे आणि आधारहीन आरोप कंगनाने केले होते. यामुळे माझी अकारण मानहानी झाली असून तिने नाहक मनसंताप दिला आहे. त्यामुळे तिच्यावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी अख्तर यांनी दाव्यांमध्ये केली होती. कोर्टाचा हा आदेश क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन २०२ अंतर्गत आला आहे. जावेद अख्तर यांनी त्यांचे वकील निरंजन मुंदर्गी यांच्यामार्फत २ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. अख्तर यांनी अंधेरी येथील महानगर दंडाधिकाऱ्यांसमक्ष ही फौजदारी तक्रार केली असून कंगनाविरुद्ध भारतीय दंड विधानातील मानहानी संबंधी कलमांखाली कारवाई करण्यात यावी, अशी विनंती कोर्टाकडे केली. कंगना रनौत माझ्याबद्दल निराधार वक्तव्ये केली असून यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे अख्तर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित वादात कंगनाने माझे नाव नाहक ओढले, असा आरोपही अख्तर यांनी केला आहे. हृतिक रोशन प्रकरणात माफी मागण्यासाठी घरी बोलावून दमदाटी केल्याचा धादांत खोटा आरोपही तिने माझ्यावर केला असून या सर्वाची गंभीर दखल घेत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी विनंती अख्तर यांना कोर्टाकडे केली. ३ डिसेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांचा जबाब नोंदवला होता.
कंगनाने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडवर गंभीर आरोप केले होते. घराणेशाहीमुळे बॉलिवूडची वाट लागली आहे. बॉलिवूडमध्ये माफियाराज पसरले आहे, असा आरोप कंगनाने केला होता. त्यात दिग्दर्शक महेश भट आणि जावेद अख्तर यांच्यावरही तिने गंभीर आरोप केले होते. हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्यात मोठा वाद भडकला होता. या प्रकरणात बोलू नये म्हणून अख्तर यांनी माझ्यावर दबाव टाकला. मला हृतिक आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागायला सांगितले. तसे केले नाही तर तुला ते जेलमध्ये टाकतील, अशी दमदाटी अख्तर यांनी केल्याचे कंगनाने मुलाखतीत जाहीरपणे सांगितले होते.