यवतमाळ (वृत्तसंस्था) सोमवारी रात्री ११ वाजता पोलिसांना कोळंबी फाट्यावर भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. घटनास्थळावर पोलिस पोहोचल्यानंतर मात्र, अज्ञात मारेकऱ्यांनी दोन युवकांना निर्दयीपणे चाकू व लोखंडी रॉडने वार करून जागेवरच ठार केल्याचे दिसले. दोघांचा एकाच वेळी खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. अविनाश हनुमंत कटरे (३२, रा.पाटापांगरा, ता. घाटंजी, ह. मु. चापडोह, यवतमाळ), उज्ज्वल ऊर्फ गोलू नारायण छापेकर (२८, रा. डेहनकर ले-आऊट) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही अविनाशच्या पाटापांगरा या गावावरून दुचाकीने यवतमाळकडे येत होते. त्यांना मारेकऱ्यांनी कोळंबी फाट्यावर अडवून ठार केले होते.
अपर पोलिस अधीक्षक पीयुष जगताप, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, दीपमाला भेंडे यांनी घटनास्थळ गाठत मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या हातावर नाव गोंदलेले होते. त्यावरून शोध सुरू केला. पहाटेपर्यंत मृतांची ओळख निश्चित झाली. नेमकी हत्या कशातून झाली, याचा उलगडा पाटापांगरा या गावातूनच झाला. वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून सुरू असलेला वाद विकोपाला जावुन चुलत काकाने मित्रांच्या मदतीने मिळून पुतण्या आणि त्याचा मित्राचा खून केल्याचे तपासात उघड झाले.
पोलीस तपासात समोर आले की, पाटापांगरा गाव गाठून चौकशी केली असता मृत अविनाश याच्या पाटापांगरा ता. घाटंजी गावात वडिलोपार्जित असलेल्या घराच्या जागेच्या हिस्सेवाटनीत आलेली जागा रिकामी करुन देण्याच्या कारणावरून त्याच्या चुलत आजी व तीचा मुलगा विकास कटरे याच्याशी वाद सुरू होता. त्यातूनच आरोपी विकास लालचंद कटरे (२३. रा. पाटापांगरा, ता घाटजी), भारत दिगांबर गाडेकर (२२), गजानन रामराव मोरे (२५, दोघे रा. मोहंमदपूर, ता बाभूळगाव) यांनी कट रचून दोघांची हत्या केल्याचे उघड झाले.
मृतक अविनाश कटरे व विकास कटरे यांच्यात वडिलोपार्जित जागेवरून वाद होता. या जागेसाठीच मृतक अविनाश हा पाटापांगरा येथे जाऊन चुलत आजी राधाबाई हिला धमकावत होता. सोमवारी त्याने आजीसोबत वाद घातला व तिला धक्काबुक्की केली. त्यामुळे संतापलेल्या विकासने बदला घेण्याचा निर्णय घेतला. अविनाश व उज्वल हे दोघे यवतमाळकडे निघाले असता त्यांच्या मागूनच विकासने दोन मित्रांना सोबत घेऊन सिनेस्टाईल पाठलाग केला. दुचाकीला धक्का देऊन दोघांना खाली पाडले आणि त्यांच्यावर चाकूने वार करत सिनेस्टाईल खून केला. त्यानंतर तेथून विकास मित्रासह गळवा ता. बाभूळगाव येथे लपून बसला. पोलिसांनी विकास ताब्यात घेतल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अवघ्या १६ तासात खुनाच्या गुन्ह्याची उकल करत आरोपींना अटक केली.