पारोळा (प्रतिनिधी) “कौन बनेगा करोडपती” स्कीममध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याची बतावणी करत एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील टिटवे येथे मायाबाई पाटील या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ५ फेब्रुवारी रोजी मायाबाई पाटील याच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरुन व्हॉट्सअप कॉल आला. फोनवर बोलणाऱ्या संबंधित व्यक्तीने मायाबाई यांना “कौन बनेगा करोडपती” स्कीममध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याची बतावणी केली. ही रक्कम मिळण्यासाठी दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना एक कॉल आला. मायाबाई यांनी हा प्रकार त्यांचे पती व मुलाला सांगितला. त्यानुसार त्यांनी मॅसेजमध्ये दिलेल्या नंबरवर फोन केला व त्यांना बँक खात्याचा नंबर मागितला. तुमचे बँक खात्यात कमी ठेवता येते. लॉटरीची एवढी मोठी रक्कम येण्यासाठी खात्याची मर्यादा वाढवावी लागेल अशी बतावणी केली. यासाठी समोरील व्यक्तीने मायाबाई यांना ऑनलाईन पैसे जमा करण्यास सांगितले.
त्यानुसार मायाबाई यांनी गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून पहिल्यांदा १८५ रूपये टाकले. त्यानंतर चार वेळा ५ हजार रुपये, ३ हजार रुपये, २५ हजार, दोन वेळा १५ हजार, १० हजार, तीन वेळा २० हजार व ३५ हजार असे एकूण १ लाख ८४ हजार ८५० रुपये पाठवले. पैसे पाठवल्यावर कुठलीही लॉटरीची रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष भंडारी हे करीत आहेत.