नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानी दिल्लीत गेल्या २५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन पुकारले असून आज आंदोलनाचा २६ वा दिवस आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, संयुक्त किसान मोर्चाने तयार केलेल्या किसान एकता मंच फेसबुक पेजवरून रविवारी रात्री बराच गोंधळ झाला. फेसबुकनं हे पेज ब्लॉक केलं. त्यानंतर फेसबुकविरोधात संताप वाढल्यानंतर हे पेज पुन्हा सुरू करण्यात आलं.
फेसबुकने कम्युनिटी स्टॅंडर्ड व्हायोलेसनचे कारण देत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यरत असलेले किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज बंद केले होते. त्यामुळे, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणारे सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषक आणि नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून नेटिझन्स आपला व्यक्त करत आहेत. फेसबुक वर पोस्ट लिहून तर ट्विटर’वर झुकेरबर्ग च्या विरोधात ट्रेंड सुरु करुन फेसबुकचा निषेध करण्यात येत आहे. रविवारी रात्रीपासूनच सोशल मीडियावर फेसबुक आणि झुकेरबर्ग विरुद्ध रोष पाहायला मिळाला. तसेच किसान एकता मंचचं फेसबुक पेज ब्लॉक केल्यानंतर तीन तासांनी पुन्हा अनब्लॉक करण्यात आलं. फेसबुककडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यावर नंतर फेसबुकनं खुलासाही केला आहे. किसान एकता मंचच्या पेजकडून कंपनीच्या कम्युनिटी नियमांचं पालन केलं जात नव्हतं म्हणून पेज बंद करण्यात आलं होतं, असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची माहिती देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने फेसबुकवर किसान एकता मंच नावाचं पेज तयार करण्यात आलं आहे. हे पेज रविवारी अचानक फेसबुककडून बंद करण्यात आलं होतं. योगेंद्र यादव यांनी याविषयी माहिती दिली आहे. फेसबुक लाईव्ह करत असताना मध्येच पेज अनपब्लिश्ड झाल्याचा संदेश मिळाला. शेतकऱ्यांविषयी असं काही तरी आहे, ज्यामुळे हे सरकार घाबरले आहे आणि सरकार असं काहीतरी आहे ज्यामुळे फेसबुकला भीती वाटली आहे, असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला. फेसबुकनं किसान एकता मंचचं इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद केलं असल्याचा दावा यादव यांनी केला. फेसबुकनं केलेल्या कारवाईवरून संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या. त्यानंतर फेसबुककडून पुन्हा किसान एकता मंचचं फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यात आलं.
















