जळगाव (प्रतिनिधी) सवलतीच्या दरात रोप उपलब्ध न झाल्याने वृक्ष रोपणातील अडचणी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मराठी प्रतिष्ठान, जळगाव यांच्या वतीने आम्ही आपणास विनम्रपणे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधू इच्छितो. वन विभागाकडून दरवर्षी १५ जूनच्या सुमारास सवलतीच्या दरात रोप उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय जाहीर होतो. परंतु, यंदा अद्याप हा निर्णय जाहीर झालेला नाही आणि सवलतीच्या दरात रोप उपलब्ध होत नसल्याने वृक्षारोपण करणाऱ्या सामाजिक संस्था, स्वयंसेवी गट आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शासन एकीकडे ‘एक पेड़ माँ के नाम’ आणि इतर मोहिमांद्वारे वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात करते. यामुळे नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु, वन विभागाकडून सवलतीच्या दरात रोप उपलब्ध न झाल्याने वृक्षारोपणाच्या उत्साहाला खीळ बसत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर वृक्षारोपणाच्या उपक्रमांना खीळ बसत असून, पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडथळा निर्माण होत आहे.
पर्यावरणाचे महत्त्व सर्वज्ञात आहे. वृक्षारोपणामुळे मातीचे संवर्धन, जलसंधारण, जैवविविधतेचे रक्षण आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे शक्य होते. यामुळे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वृक्षारोपण हा एक प्रभावी उपाय आहे. परंतु, रोपांच्या उपलब्धतेअभावी नागरिकांचा उत्साह कमी होत आहे, ज्यामुळे शासनाच्या पर्यावरण संवर्धनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
याबाबत आपण तातडीने लक्ष द्यावे तसेच सवलतीच्या दरात रोप उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने शासन निर्णय जाहीर करावा याबाबत पाठपुरावा करावा. वन विभागाला रोपवाटिकांमधून दर्जेदार रोपांचा पुरवठा त्वरित सुरू करण्याचे निर्देश द्यावेत. स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी समन्वय समिती स्थापन करावी.वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वीततेसाठी पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा विकसित करावी.
आम्ही आपणास विनंती करतो की, या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करावी, जेणेकरून पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला गती मिळेल आणि नागरिकांचा विश्वास शासनावर कायम राहील. आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.