मुंबई (वृत्तसंस्था) “राज्यात सध्या १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करायचं आहे. मात्र सध्या लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा झाली आहे. येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यांमधील लशींच्या उपलब्धतेचा प्रश्न मिटावा यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून लस आयातीचे एक स्पष्ट धोरण ठरवणे आवश्यक असल्याचे मत आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केले आहे. तसे झाल्यास हा प्रश्न जलदगतीने सुटण्यास मदत होणार आहे. कोरोना विरुद्धची लढाई लढत असताना लस घेतलेल्या नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे टोपे म्हणाले. ज्या नागरिकांनी दोन लशी घेतल्या असतील, अशांनीही सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. दोन लशींचे डोस घेतलेल्या नागरिकांनी देखील मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे टोपे म्हणाले. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही, असेच टोपे म्हणाले.
जेव्हा लशींचे दोन डोस घेतले जातात तेव्हा शरीरात मोठ्या प्रमाणात अँटिबॉडी तयार होत असतात. शरीरात मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्या असतील तरी त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र लशींचे डोस घेतलेल्या व्यक्तींकडून इतरांना संसर्ग होत नसला तरी देखील मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
















