चित्तूर (वृत्तसंस्था) आंध्र प्रदेशमध्ये दहावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी मुलीने आपल्या आई-वडिलांसाठी एक चिठ्ठा लिहीली आहे.
चित्तूरच्या पालमनेरमध्ये राहत असलेल्या मिस्बाह फातिमाचे वडील सोडा विकून आपल घर चालवतात. फातिमा गंगावरम इथल्या ब्रह्मर्षी शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. फातिमानं आत्महत्येपूर्वी आपल्या आई वडिलांसाठी एक चिठ्ठी लिहून त्यांची माफी मागितली आहे. आपली मुलगी प्रथम यावी म्हणून एका मुलीच्या वडीलांनी शाळा प्रशासनावर दबाव टाकून मला शाळेतून काढून टाकले आहे, असे कारण आत्महत्या केलेल्या मुलीने लिहून ठेवले आहे. चिठ्ठीत पुढे लिहीले आहे की शाळेच्या मुख्याध्यापकांनी कुठलंही कारण न देता मला शाळेतून काढून टाकले आहे.
फातिमाच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस अतिशय धीम्या गतीनं तपास करत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आरोप सत्ताधारी पक्षाचा नेता असल्यानं त्याला पाठिशी घालत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तेलगु देसम पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा लोकेश यांनी मिस्बाह फातिमाच्या आत्महत्येसाठी वायएसआर काँग्रेसच्या नेत्याला जबाबदार धरलं आहे. मिस्बाहला वायएसआर काँग्रेसचे नेते सुनील यांच्या मुलीपेक्षा अधिक गुण मिळाले होते. त्यामुळे मिस्बाहला त्रास दिला जात होता. तिला सातत्यानं धमक्या दिल्या जात होत्या. खुद्द मुख्याध्यापकच तिला धमकावत होते. त्यामुळे मिस्बाहनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप लोकेश यांनी केला आहे.
















