जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना तीन दिवस मुंबईत मंत्री मंडळाच्या बैठकांना हजर रहावे लागते. त्यामुळे मंत्र्यांची भेट घेणे नागरीकांना शक्य होत नाही. परंतु, आता प्रत्येक गणात बैठक घेऊन नागरीकांच्या समस्या जागेवरच सोडवल्या जातील. त्यासाठी तलाठी, तहसिलदार, प्रांत यांनाही गावातच बोलावून घेऊ, अशी हमी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिली. वावडदा येथे झालेल्या पंचायत समिती गण संपर्क बैठक या अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
या अभियानांतर्गत मंत्री महाेदयांनी गेल्या चार वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती बॅनर, माहिती पुस्तीकेच्या स्वरुपातून नागरीकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती प्रतापराव पाटील यांनी केली. वराड गावातील स्मशानभुमीचे वॉल कंपाऊंड व शिवरस्ता म्हसावद गावातील पाणी पुरवठा, पिक कर्ज, वसंतवाडी ते रामदेववाडी व वसंतवाडी ते विटनेर या भागातील शेतरस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी पुढकार घेण्यात येईल. मुस्लीम कब्रस्तानसाठी बीडीओशी बोलून लागलीच निधी उपलब्ध करुन दिला जाईल. यासह अनेक वैयक्तीक तक्रारींवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने प्रतापराव पाटील यांनी उपाय-योजना सुचवल्या.
मंत्री महोदय ना. गुलाबराव पाटील यांनी ९८ टक्के निधी खर्च केला असून यापुढे देखील अशाच प्रकारे जनतेच्या कामासाठी तत्पर असण्याची ग्वाही दिली. गण संपर्क अभियानातून नागरीकांच्या समस्या सुटून चांगला प्रतिसाद मिळेल असेही त्यांनी सांगीतले. जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाचा आणि गावातील विकास कामांचा प्रचार करायला हवा. विरोधक खोट्या बातम्या पसरवत असतांना आपल्या पक्षातील प्रत्येक माणसाने याला विरोध करत सत्य परिस्थिती सांगायला हवी असे आवाहन केले.
कार्यक्रमास धनंजय सोनवणे, शिवराज पाटील, नानाभाऊ सोनवणे, रमेश आप्पा पाटील, अर्जुन पाटील, माजी उपसभापती समाधान चिंचोरे, शितल चिंचोरे, तालुका प्रमुख अजय महाजन, म्हसावदचे सरपंच गोविंद पवार, अनिल भोळे, सामाजिक कार्यकर्ते रवि कापडणे, अनिल पाटील, माधवराव सोनवणे, प्रकाश काळे, वराडचे उपसरपंच संदीप सुरळकर, पी.के. पाटील, शिरसोली माजी सरपंच अनिल पाटील, राजू चौधरी, चेअरमन बबन शिरसोली उपस्थित होते.