नशिराबाद (सुनील महाजन) येथील रेल्वे स्टेशन जवळील गेट क्रमांक १५३ गेल्या तीन वर्षांपासून भुयारी मार्गाच्या कामासाठी बंद आहे. गेट बंद असल्याने रेल्वे लाईनच्या पार शेती असलेल्या असंख्य शेतकऱ्यांचा फार मोठ्या संकटाला सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे कष्ट लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यावतीने रेल्वे विभाग भुसावळ येथील महा रेल्वे प्रबंधक यांच्या कार्यालयात भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी पाठपुरावा सातत्याने सुरू असताना अखेर रेल्वे विभाग भुसावळ उप मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांना लेखी पत्र देऊन येत्या २५ नोव्हेंबरपासून कामास सुरुवात करून मार्च २०२२ पर्यंत सदरचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वस्त केले आहे.
मध्य रेल्वे बांधकाम विभागातर्फे मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काम सुरू होणार असल्याचे आता काही काळातच आपल्याला शेतीच्या कामासाठी अधिकचे कष्ट घ्यावे लागणार नाही. पुढील वर्षाच्या हंगामापूर्वी आपल्याला जवळचा रस्ता रहदारीसाठी सुरू होणार असल्याने शेतकरी आशावादी झालेला आहे. सदर पत्र मिळाल्याने आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. भादली रेल्वे गेट बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी भादली सब स्टेशन कडील गेट क्रमांक १५२ च्या रस्त्याने शेतात जावे लागत आहे. त्यासाठी त्यांना अधिक दोन ते तीन तास वेळ लागत असून त्याच्या परिणाम शेतात कामावर होत असून उत्पन्नात ही घट झाली होती. बैलांना सुद्धा अधिकचे श्रम करावे लागत असून आधीच अस्मानी संकटाने त्रस्त असलेले शेतकरी या समस्यांमुळे अगदी मेटाकुटीला आलेला आहे. भादली रेल्वे गेट येथे भुयारी मार्ग होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे २८ ते ३० जुलै रोजी भादली रेल्वे स्टेशनच्या बाजूला शेतकरी गांधीगिरी आंदोलन करणार होते.
यावेळी स्थानिक वृत्तपत्रात २८ जुलै रोजी रेल्वे विभागाने सप्टेंबर अखेर काम सुरू करणार असल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी गांधीगिरी आंदोलन स्थगित केले होते. २४ सप्टेंबर २०१९ रोजी भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक यांना सप्टेंबर अखेर काम सुरू करणार असल्याचे पत्र देण्यात आले होते. १५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम सुरू न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्यात कळविण्यात आले असताना त्यानंतर १८ ऑक्टोबर २०१९ रोजी मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज धाबारे यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी २५ नोव्हेंबर रोजी काम सुरू करणार असल्याचे पत्र दिले. मात्र एकंदरीत शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याचे फलित होतांना दिसत असून लवकरच शेतकऱ्यांच्या समस्या दूर होत असल्याने शेतकऱ्यांनी सायंकाळी आलेल्या विठ्ठल मंदिर खालची आळी येथे बैठक घेऊन एक आनंदही व्यक्त केला. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांना रेल्वे विभागाने पत्र दिल्याने अनेकांनी महाजन यांचे आभारही व्यक्त केले. भादली रेल्वे स्टेशन गेटच्या भुयारी मार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे.
















