मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने सांगली येथील सर्जेरावदादा नायक शिर्ला सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
आरबीआयने आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, “परवाना रद्द झाल्यानंतर सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक लिमिटेडचे बँकिंग व्यवहार बुधवारी कामकाजाचा दिवस समाप्त झाल्यासोबतच बंद करण्यात आले. महाराष्ट्रातील सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांनाही बँक बंद करण्याचे आदेश जारी करुन कर्जदारासाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे, असंही पत्रकात म्हटलं आहे. आरबीआयने सांगितले की लिक्विडेशनवर प्रत्येक ठेवीदाराला डीआयसीजीसीकडून पाच लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार असेल.
आरबीआयने ३ बँकांनाही दंड ठोठावला
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याआधी तीन सहकारी बँकांना दंडही ठोठवला होता. रिझर्व्ह बँकेने छत्तीसगडच्या रायपूरमधील नागरिक सहकारी बँक लिमिटेडसह तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. या बँकांना नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला (पन्ना) एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.