जळगाव (प्रतिनिधी) भारतीय साहित्याने आपल्या सामाजिक वास्तवाला दुर्लक्षित न करता साहित्याच्या माध्यमातून जगापुढे आणण्याचा जो प्रयत्न केला. त्यात दलित साहित्याचा आंबेडकरी साहित्याचा, स्त्री साहित्याचा महत्त्वपूर्ण वाटा असून कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर यांचा ओसंडले शब्दकण हा कवितासंग्रह तोच वसा आणि वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असून साहित्य हा समाजाचा आरसा असल्याचे मत डॉ. मिलिंद बागुल यांनी सत्यशोधकी साहित्य परिषदेने कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर यांच्या ओसंडले शब्दकण कवितासंग्रहाच्या प्रकाशना प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कवयित्री माया धूप्पड, गझलकार ज्ञानेश पाटील यांच्या हस्ते कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कवयित्री माया धूप्पड याप्रसंगी बोलताना म्हणाल्या ओसंडले शब्दकन या कवितासंग्रहातील कविता आत्मभान जपण्याबरोबरच स्त्रियांच्या मनोभूमिका व्यक्त करणाऱ्या आहेत. वर्षानुवर्षापासून स्त्रियांच्या एकूणच जगण्याच्या दिशा ठरलेल्या होत्या शिक्षण घेऊन प्रगती साधून त्या लिहू, वाचू लागल्या आणि यातूनच नव्या युगाची सुरुवात स्पष्टपणे दिसून येते, कवयित्रीच्या मनातील भावना अनेक स्त्रियांच्या मनांच्या भावनेचे प्रतिनिधी करणारे असेच आहे असे देखील मत त्यांनी याप्रसंगी मांडले.
गझलकार ज्ञानेश पाटील यांनी ओसंडले शब्दकण हा कवितासंग्रह सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, वास्तव अनुभूती देणारा कवितासंग्रह असून कवयित्री ज्योती वाघ यांनी आपल्या अनुभवी विश्वाला कवितेच्या माध्यमातून साकारलेले असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले. या कार्यक्रमासाठी बुलढाण्याहून आलेल्या विजय कस्तुरे यांनी देखील आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. डी. इव्हेंटचे दिनेश थोरात यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख अतिथी डॉ. जगदीश पाटील, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, उपशिक्षणाधिकारी प्रतिमा सानप, शिक्षण विस्ताराधिकारी विजय पवार यांनी समायोचित मनोगते व्यक्त केलीत. सुरुवातीस कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर यांनी कविता संग्रहाविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली.
यानंतर कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर यांच्यापुस्तकात समाविष्ट असलेल्या कवितांचे वर्षा पगारे, प्रविण लोहार, मंजुषा पाठक, शितल पाटील, सुधीर महाजन, अशोक पारधे, आशा साळुंखे, चित्रा पगारे यांनी प्रभावी वाचन केले. विचार मंचावर अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी गौतम बाविस्कर, अनिता परमार मॅडम, संध्या महाजन इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी तर आभार सुधीर महाजन यांनी मानले.