मुंबई (वृत्तसंस्था) पुण्यासारख्या ठिकाणी जिथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
पुण्यात अॅक्टिव्ह केसेस १.४ लाख आहेत. आतापर्यंत राज्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. अन्य ठिकाणांहून पुण्यात लोक उपचारांसाठी येत असल्याने ही संख्या जास्त असल्याचे सरकारने सांगितलं. कोर्टाने यावेळी पुण्यातील संख्या चिंताजनक असल्याचं म्हटलं. तसंच पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे असं मत नोंदवलं. हायकोर्टाने यावेळी मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला पाहिजे सांगत जर मुंबई मॉडेलंच सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं असेल तर इतर पालिकांनीही हे मॉडेल स्वीकारलं पाहिजे असा सल्ला दिला.
पुणे पालिकेचे वकील कुलकर्णी यांनी यावेळी मुंबईत चांगल्या पायाभूत सुविधा असल्याचं सांगितलं. दरम्यान पुण्यातील स्थितीवर बोलताना कोर्टाने तुमचे पालिका आयुक्त मुंबई पालिका आयुक्तांशी का बोलत नाहीत? अशी विचारणा पुणे पालिकेच्या वकिलांना केली. “तुमच्याकडे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट आहे. तुमच्याकडील पायाभूत सुविधा मुंबईसारख्या चांगल्या नसतील. पण काहीतरी केलं पाहिजे,” असं कोर्टाने यावेळी खडसावलं.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन मुंबई महापालिकेचं कौतुक केलं. याचा उल्लेखही उच्च न्यायालयाने केला. मुंबईतील ऑक्सिजन पुरवठ्याचा दाखला सर्वोच्च न्यायालयानही दिला ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र मुंबईचा आदर्श जर देशासाठी असेल राज्यातील इतर महापालिकांनाही तो घ्यायलाच हवा, असंही हायकोर्टाने नमूद केलं. तसंच राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा जीव जाणार नाही याची काळजी घेण्याचा सल्लाही हायकोर्टाने दिला.