मुंबई (वृत्तसंस्था) “महाराष्ट्रात लॉकडाऊनबाबत आज महत्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
लॉकडाउनची चर्चा सुरू असून, यापार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला. “विषाणूची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतोय. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करतोय. पण कुठेही कमतरता दिसत नाही म्हणून मला असं वाटतंय की, राज्य सरकारचा आज यासंदर्भातील मोठा निर्णय घेणार. लॉकडाउन हा शब्द लोकांच्या मनात भीती निर्माण करतो. कारण रात्री आठ वाजता यायचं आणि लोकांसमोर बोलायचं. लोक मग या मानसिकतेतून बाहेर येत नाही. राज्य सरकारला चेन ब्रेक करायची आहे. लोकांना सोबत घेऊन लोकांचं म्हणणं ऐकून आम्हाला हे करायचं आहे. पुढील काळासाठी चांगल्या गाईडलाईन्स तयार करण्यासाठी आम्ही लागलो आहोत. मला वाटत आजच यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील,” अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.
“महाराष्ट्रातील परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. मुंबईत जशी जम्बो कोविड सुविधा तयार केली गेली. तशी राज्यात गेल्या. त्या जम्बो कोविड सेंटरमध्ये बेड वाढवण्यात आले. पण, काही लोकांना खासगी रुग्णालयात जायचं असतं, तिथं वेटिंग लिस्ट आहेत. पण आजही शासकीय असो वा महापालिका रुग्णालय असो, तिथे जागा उपलब्ध आहे. तिथे ऑक्सिजनही उपलब्ध आहेत. जम्बो कोविड केंद्रात जास्तीत जास्त बेड हे ऑक्सिजन आणि आयसीयू बेड आहेत. आताची स्थिती बघून आपण नाईट कर्फ्यू लावला. दिवसा जमावबंदी केला. वीकेंड लॉकडाउन करुन बघितला. पण, जितकी रुग्णसंख्या कमी होणं अपेक्षित आहे, तितकी होत नाही. त्यामुळे सरकार सगळ्यांचे सल्ले घेत होते. त्यातून आज गाईडलाईन्स तयार होतील आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल,” असंही अस्लम शेख म्हणाले.
राज्यात १२-१३ दिवसांचा लॉकडाऊन, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्रात लॉकडाऊन १२ ते १३ दिवसांचा असू शकतो, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. राज्यातल्या परप्रांतिय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नका. तुमची सगळी काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल. महाविकास आघाडी सरकार आणि कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र तुमची काळजी घेईल याच आश्वासन देतो, असं मुश्रीफ म्हणाले.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
लॅाकडाऊनमध्ये जिल्हाबंदीपासून इतर कडक निर्बंध असतील. लॅाकडाऊन जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी अंमलबजावणी होणार आहे. लोकांना तयारी करण्यासाठी वेळ दिला जाईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वजेट्टीवार यांनी दिली. राज्यात ॲाक्सिजनचा तुटवडा असल्याने ॲाक्सिजन उत्पादन वाढवणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच ॲाक्सिजन प्लांट सुरु होणार असंही ते म्हणाले.