मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहात गोंधळ झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देण्यात आल्या. गोंधळामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी सभागृहातील अभिभाषण थांबवत निघून गेले.
काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या विधानावरुन सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि राज्यपालांच्या अभिभाषणावेळी घोषणाबाजी सुरू केली.
राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात होताच सत्ताधारी आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सुरू केला. त्यानंतर विरोधी पक्षानेही नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजुंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने सभागृहात एकच गदारोळ झाला. अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण थांबवत सभागृहातून निघून गेले.
यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं, राज्यपालांना विधानभवनातून बाहेर जाव लागलं हे दुर्देव आहे. राज्यपालांना बोलण्यास सरकारकडून अडचणी आणल्या गेल्या. यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. राज्यपालांनी अभिभाषण पूर्ण केलं नाही. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करत सत्ताधारी आमदारांपैकी एका आमदाराने शिर्षासन करुन आंदोलन केलं. तसेच इतर आमदारांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी केली.