मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासात महाराष्ट्र राज्यात ३ हजार ५८० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ०९ हजार ९५१ झाली आहे. राज्यात ५४ हजार ८९१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ८९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९ हजार ०५८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.
तर मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग अद्याप नियंत्रणात असून चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण बाधित आढळण्याचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खालीच आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाण आणखी घसरले असून ते १२.७३ टक्के झाले आहे. गुरुवारी ६४३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून १२ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या २ लाख ८९ हजारांवर गेली आहे. तर एका दिवसात ७११ रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत २ लाख ६९ हजार म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, वर्षअखेर आणि नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या धिंगाण्याच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लावला असताना मास्कशिवाय फिरणाऱ्यांविरोधातही पालिकेने तीव्र कारवाईला सुरुवात केली आहे. एप्रिलपासून सुरु असलेल्या कारवाईत आतापर्यंत ८ लाख २० हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून १६ कोटी ७६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लोणावळ्यात ५ जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. ख्रिसमस, न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पर्यटकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाने निर्णय घेतला आहे. लोणावळ्यात नाईट कर्फ्यूचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
दरम्यान, ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूमुळे खबरदारीचा उपाय योजना म्हणून राज्य शासनाने रात्रीच्या वेळी संचार बंदी जाहीर केली आहे. कल्याण मध्ये २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ४५ नागरिक ब्रिटनमधून परतले असून या नागरिकांची यादी राज्य शासनाने महापालिकेला दिली आहे. या सर्वांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.