मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षांनी बंदचं आवाहन केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपाने सरकारवर टीका सुरू केली आहे. ‘नवरात्री उत्सवाच्या काळात महाराष्ट्र बंद करणे ही तिघाडीतील तीन पक्षांची महिषासुरी चाल आहे, अशी टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ट्वीट करून महाआघाडीच्या बंदच्या भूमिकेवर आसूड ओढले आहेत. ‘ज्यांनी मुंबईला बंद करून आपलं दुकान चालवलं त्या तथाकथित ‘बंदसम्राटांचा’ इतिहास आज पुन्हा आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठिंबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करून कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले. एवढंच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचं काम बंद करून मुंबईकरांना वेठीस धरलंय. कोस्टल रोडला विरोध… नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध. मेट्रोचेही हे विरोधकच. हे तर विकासातील गतीरोधक आहेत,’ अशी टीका शेलार यांनी तिन्ही पक्षांवर केली आहे.
‘बंद आणि विरोध हाच यांचा ‘धंदा’ आहे. त्यावरच यांचा ‘चंदा’ गोळा होतो. हे ‘बंद’ आता बंदच केले पाहिजेत. आई जगदंबेच्या नवरात्री उत्सवाच्या काळात महाराष्ट्र बंद करणं ही तर तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’ चाल आहे,’ असा आरोप करतानाच, ‘आई दुर्गामाते, या महिषासुरांचा बंदचा हा खेळ उधळून टाकण्यासाठी जनतेला बळ दे,’ असं साकडं शेलार यांनी घातलं आहे.