मुंबई (वृत्तसंस्था) कोश्यारीचं वय काय? ते बोलतायेत काय? राज्यपाल पदावर बसलेत म्हणून मान राखतो. नाहीतर महाराष्ट्रात शिव्याची कमी नाही असं म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
राज ठाकरे हे मुंबई आयोजित मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. राज्यपाल कोश्यांरींच्या वक्तव्यावर बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, कोश्यारी यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना धोतर असं संबोधलं. ते म्हणाले, ‘त्या दिवशी ते आमचं धोतर बोललं नाही का… कोश्यारी. वय काय, बोलतोय काय, काय चाललंय. राज्यपाल पदावर बसला आहेस म्हणून मान राखतोय, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही.’ ते काय बोलून गेले महिन्याभरापूर्वी… म्हणे इथले जर गुजराती आणि मारवाडी जर परत गेले, तर इथे काय होईल. कोश्यारीजी, पहिल्यांदा त्या गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारा की, तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात?. तुम्ही उद्योपती आहात ना, तुम्ही व्यापारी आहात ना… मग तुमच्या राज्यात का नाही व्यापार केलात?, का नाही उद्योग थाटलेत? याचं कारण असं की उद्योगधंदे थाटण्यासाठी आणि व्यापर करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रासारखी सुपिक जमीन नव्हती.’
महाराष्ट्राचा गौरव करताना राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा… अहो, महाराष्ट्र मोठाच होता हो. मोठाच आहे. हा जेव्हा देश नव्हता तेव्हा या देशाला, या भागाला हिंद प्रांत म्हणत. पर्शिया म्हणजेच नंतरचा इराण, ते लोक या भागाला हिंद प्रांत म्हणत. या हिंद प्रांतावर आजपर्यंत आक्रमणं झाली. त्यात मोगल आले, ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले. मोगल तर किती वर्षे होते, ब्रिटिश तर किती वर्षे होते. पण या हिंद प्रांतावर जर खऱ्या अर्थाने कोणी सव्वाशे वर्षे राज्य केलं असेल तर ते आमच्या मराठेशाहीने केलं. महाराष्ट्र समृद्ध होताच ओ. महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला कोश्यारींकडून नाही ऐकायचे आहे.’
अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हल्ली कोणी काय येतंय काही बरळतंय. राजकीय पक्षाचे जे काही प्रवक्ते बोलत असतात अरे कोणती भाषा. मी असा महाराष्ट्र बघितला नाही. एक मंत्री एका महिलेला भिकारचोट म्हणतो. काय भाषा असते काय बोलत असतात. त्यांना वाटतं विनोद करतो. तू कोण आहेस, आपली लायकी काय आपण काय बोलतो. मला भीती वाटते, आताचे तरुण हे पाहत असतील आणि ते म्हणत असतील असे असते का राजकारण? मग ठीक आहे, जातीपातीचे विष कालवण्यासाठी हे सुरू आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणलाे की, कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले. बाळासाहेब जी भूमिका बोलत होते भोंगे उतरले पाहिजे ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण भोंगे काढा असे नाही म्हणालो, नाही काढले, तर हनुमान चालीसा लावू असे सांगितले. पण अजून काही ठिकाणी चरबी जिरलेली नाही. जिथे जिथे हे सुरु असेल तर पोलिसांना तक्रार दाखल करा. तरी झालं नाही तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा.
राहुल गांधी म्हणजे म्हैसूर सँडल सोप आहे, सावरकरांवर बोलण्याची त्यांची लायकी आहे का? सावरकरांनी काय हाल सहन केले हे त्यांना माहिती आहे का? तो दयेचा अर्ज नव्हता सावरकरांची रणनीती होती, असे म्हणत राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. गुजरातमधून 20 हजार युपीच्या लोकांना लोकेश ठाकूर यांनी हाकलून दिले. मात्र राज ठाकरेंनी जर हे केले तेही महाराष्ट्रांतील तरुणांच्या नाोकरीसाठी हे चुकीचे आहे. भूमिका लोकांपर्यंत पोहचविणारे तुम्ही आहात, तुमच्या मार्फत 16 वर्षांत काय केले, यावर आपण एक पुस्तक काढत आहोत अशी घोषणाही राज ठाकरेंनी केली आहे.















