मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही नावांवर आक्षेप घेऊ शकतात, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांची लवकर नियुक्ती करावी अशी मागणी वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. ६ नोव्हेंबर २०२० रोजी महाविकास आघाडी सरकारनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ जणांच्या नावाची यादी पाठवली होती. राज्यपाल नियुक्त जागांबाबत नियुक्तीचा वाद कोर्टापर्यंत गेला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र काही कारणास्तव ही भेट झाली नाही. परंतु आज उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेतली.
या भेटीचा पूर्ण तपशील समोर आलेला नाही. तथापि, १२ जणांच्या यादीतील आक्षेप घेतलेली नाव वगळण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. मात्र बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांनी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही. अजित पवार यांनी मात्र बारा आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेट्टी यांच्या ऐवजी दुसरं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. तर खडसे यांची ईडी चौकशी सुरु असल्यानं राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून त्यांच्या नावाला आक्षेप घेतला जाऊ शकतो, असंही बोललं जात आहे.