पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर पुण्यात पुढील सात दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून दिली. पुण्यात आता बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार असून उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.
पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत प्रतिदिवस करोनाबाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे. तसेच, अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत. अशी देखील माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे. गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे. शाळा, महाविद्यालयं ३० एप्रिल पर्यंत बंद असणार आहेत. तर, यामध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांटी गैरसोय होऊ देणार नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. आता पुढील आठवडयात म्हणजे शुक्रवारी निर्बंधांचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
याशिवाय आयुक्त सौरभ राव म्हणाले, दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे. याच अनुषंगाने पायाभूत सुविधांवर भर देणं. आरोग्य सुविधा बळकट करणं, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर्स आदींची संख्या वाढवणे हे आवश्यक आहे. काल महत्वाच्या रूग्णालयांसोबत एक बैठक झाली, त्या अनुषंगाने आपण रूग्णालयांमधील बेड्सची संख्या वाढवत आहोत. जर रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर निश्चितच काही रूग्णालयांना आपल्याला १०० टक्के कोविड रूग्णालय म्हणून घोषित करावं लागेल.
ग्रामीण भागात सध्या ज्या ठिकाणी व्हेटिंलेटर्स वापरात नाहीत, ते हळूहळू शहरी भागात हलवले जात आहेत. याचं कारण म्हणजे शहरी भागांमधील रूग्णालयात मोठ्यासंख्ये ग्रामीणभागातूनही रूग्ण दाखल होत आहेत. याशिवाय अन्य जिल्ह्यांमधून देखील रूग्ण आता पुण्यात दाखल होत आहेत.
१० वी, १२ वी, MPSC च्या परीक्षांचं काय?
सौरभ राव यांनी सांगितले की, दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. त्यात कोणताही बदल केला जाणार आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालये ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असेही राव यांनी यावेळी स्पष्ट केले. व्यायामशाळा सुरु राहतील. पुण्यात दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.