मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसे पक्ष पुन्हा एकादा आक्रमक झाला आहे. वाढीव वीज बिलात नगरिकांना सवलत देण्यात येईल असे आश्वासन देऊन त्याची पूर्तता न केल्याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव व बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार मनसेने शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात केली आहे.
वाढीव वीज बिलाबाबत याआधीही मनसेने पोस्टकार्ड आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा हाच मुद्दा घेत मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात भेट देत शिवाजीपार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तक्रार दाखल करून घेण्यासाठी निवेदन सादर केले. कोरोना महामारीच्या दिवसांत टाळेबंदी असताना महावितरण कडून वीज मीटर रीडिंगसाठी प्रतिनिधि पाठविण्यात आले नाही या काळात ग्राहकांना वीज वापरांपेक्षा अतिरिक्त जादा बिल बेस्ट कडून पाठविण्यात आले होते. लॉकडाउनमुळे उतपणणचे स्त्रोत बंद असताना वाढीव वीज बिल पाहून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोशयारी यांची भेट घेत वीज बिलाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे वाढीव बिलांबाबत तक्रारी मांडल्या होत्या तसेच बैठकी देखील घेण्यात आल्या या बैठकीत वीज बिलात कपात करून नगरिकांची दिवाळी गोड करू असे आश्वासन देण्यात आले होते असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. सातत्याने याचा पाठपुरावा करूनही दिवाळी नंतर ऊर्जा मंत्र्यांनी घुमजाव केले वीज बिलात सवलत न देता मीटर रीडिंग नुसार बिल भरावेच लागेल असे सांगण्यात आले त्यामुळे नागरिकांची एकप्रकारे आर्थिक फसवणूक केली यासाठी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (२५ जानेवारी) वीजबिलावरुन सरकारला धारेवर धरलं. जेवढी वीज वापरली तेवढे बील देऊ, पण जी वीज वापरलीच नाही ते वीजबिल देणार नाही, असे फडणवीसांनी सरकारला ठणकावले होते. त्यानंतर आता मनसेने उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.